वर्षभरानंतरही स्थिती जैसे थे !
By admin | Published: August 16, 2015 11:54 PM2015-08-16T23:54:48+5:302015-08-16T23:54:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इरादापत्रे देण्यात येऊन वर्ष उलटले; तरीही जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भूखंड देण्यात आलेले नाहीत.
उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इरादापत्रे देण्यात येऊन वर्ष उलटले; तरीही जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भूखंड देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रविवारी केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलनात भाग घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंडन केले आणि पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आलेल्या इरादापत्रांचे जाहीररीत्या श्राद्ध घातले.
करळफाटा येथे उरण उत्कर्ष समितीच्या वतीने रविवारी (१६) हे आंदोलन करण्यात आले. जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न मागील ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्रात सत्ता उपभोगणाऱ्या यूपीए सरकारने वारंवार आश्वासने देऊन जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले आहे.
सत्तेवर आल्याबरोबर केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सुमारे ३० वर्षांपासून प्रलंबित राहिलेला साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १६ आॅगस्ट २०१४ रोजी जेएनपीटी सेझ प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी उरणमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड वाटपाच्या इरादापत्रांचे वाटप करण्यात आले होते. मात्र वर्षभरात शेतकऱ्यांना एक इंचही जागेचे वाटप करण्यात आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इरादापत्रांचे वाटप झाल्यानंतरही भूखंड मिळत नसल्याने १६ आॅगस्टला शेतकऱ्यांच्यावतीने इरादापत्रांचे वर्षश्रद्ध घालण्याचा इशारा उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने पंतप्रधानांना दिला होता. उरण उत्कर्ष समितीने जाहीर केलेल्या या वर्षश्राद्ध आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादीने जाहीर पत्रक काढून पाठिंबाही दिला
होता. त्यानुसार करळफाटा येथे रविवारी (१६) इरादापत्रांचे श्राद्ध घालण्यात आले.
या प्रसंगी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भावना घाणेकर आदींसह नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. संतप्त झालेल्या शेकडो जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, काँग्रेसचे जे. डी. जोशी, भूषण पाटील आणि शेतकऱ्यांनी केंद्र - राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला.
इतक्यावरच न थांबता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंडन करून घेऊन पंतप्रधानांच्या हस्ते वाटप केलेल्या इरादापत्रांचे जाहीररीत्या श्राद्ध घातले. (वार्ताहर)