भारताने २८ वर्षांनी वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावल्यानंतर आयपीएलचा चौथा हंगाम रंगला. वर्ल्डकपमच्या व्यस्त वेळापत्रकानंतर क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळावे लागल्याने अनेकांनी क्रिकेटच्या या अतिरेकावर नाराजी व्यक्त केली. चौथ्या पर्वात कोच्ची टस्कर्स व पुणे वॉरियर्स या दोन नव्या संघांची भर पडल्याने आयपीएलमधील एकूण संघाची संख्या १० वर पोहोचली.
वर्ल्डकपचा फिव्हर उतरत नाही तोच आयपीएलचा हंगाम सुरु झाला. संघमालकीतील संशयास्पद व्यवहारांमुळे चौथे पर्व चांगलेच गाजले. कोच्ची टस्कर्समध्ये सुनंदा पुष्कर व शशी थरुर यांचे नाव गोवल्याने हा संघ आयपीएल सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोव-यात सापडला होता. संघांची संख्या वाढल्याने सामन्यांची संख्या वाढवण्यात आली व हे पर्व अक्षरशः रटाळ वाटू लागले. याच काळात आयपीएलमधील अनागोंदी व बेशिस्त कारभार चव्हाट्यावर आल्याने क्रिकेटप्रेमींनी डोक्यावर घेतलेल्या आयपीएलवर टीकेला सुरुवात झाली. ८ एप्रिल २०११ रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पहिला सामना रंगला. अटीतटीच्या सामन्यात कोलकातावर अवघ्या दोन धावांनी मात करत चेन्नईने चौथ्या पर्वात विजयी नारळ फोडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्या रचली.
कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे सक्षम नेतृत्व व संघातील अन्य खेळाडूंनी त्याला दिलेली मोलाची साथ या आधारे चेन्नई सुपरकिंग्जने सलग चौथ्यांदा सेमीफायनलमध्ये स्थान पटकावले. फायनलमध्ये चेन्नईने एकतर्फी लढतीमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा ५८ धावांनी विजय मिळवला. आयपीएलमध्ये जेतेपद कायम राखण्यात यश मिळवणारा चेन्नई सुपर किंग्ज हा पहिला संघ ठरला.