मुंबई : ठाण्याच्या अमन फारूख संजयने महाराष्ट्राच्या रोहन गुर्बानीचा २-० असा धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर क्रिष्णा खैतान स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी गटात विजेतेपदाला गवसणी घातली. तब्बल १० वर्षांनी ठाणेकरांनी अमनच्या रूपाने राष्ट्रीय एकेरीचे विजेतेपद पटकावले. चंदीगड येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत अमन विरुद्ध रोहन यांच्यात चुरशीचा सामना पार पडला. अमनने आक्रमक स्मॅशचा प्रभावी वापर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. पहिल्या सेटमध्ये अमनने २१-१७ अशा फरकाने विजय मिळवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र महाराष्ट्राच्या रोहनने कडवी झुंज दिली. अमननेदेखील चोख प्रत्युत्तर दिले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात अमनने २२-२० अशा फरकाने बाजी मारत स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी उपांत्य फेरीत अमनने गोपीचंद अकादमीच्या आंध्र प्रदेशच्या डी. जसवंतवर २१-१५, १६-२१, २१-१५ अशी मात केली. सामन्यातील १-१ अशा बरोबरीनंतर निर्णायक गेममध्ये अमनने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली.ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत अमनने बॅडमिंटनचे धडे गिरवले. दुहेरीत ठाणेकर खेळाडूंनी अनेक अजिंक्यपद पदके मिळवली आहेत.मात्र एकेरीचे अजिंक्यपद मिळविण्यासाठी तब्बल १० वर्षांचा काळ लोटला. अमनच्या अथक परिश्रमाने ठाणे शहराला एकेरीत अजिंक्यपद मिळाले आहे. ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या वतीने त्यास इंडोनेशिया येथे पाठविण्यात आले आहे. माजी जगज्जेता ई. सुगियारतो यांच्या मार्गदर्शनाखाली तो एक महिना बॅडमिंटनमधील बारकावे आत्मसात करणार आहे. आगामी उडिपी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही तो विजयाची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी व्यक्त केला. ठाणे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील अन्य खेळाडू देखील राष्ट्रीय आणि राज्य स्पर्धेत पदकांची कमाई करत आहे. चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात ठाण्याच्या रोहन स्थूलने पात्रता फेरी गाठली. रत्नागिरी येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रोहनने विजेतेपदावर नाव कोरले. अकादमीच्या ईशान नक्वीने पश्चिम विभागीय आंतरराज्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. (क्रीडा प्रतिनिधी)
अमनची अजिंक्यपदी झेप
By admin | Published: October 24, 2016 5:01 AM