ऑनलाइन टीम
मँचेस्टर, दि. १० - इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत एक डाव आणि ५४ धावांनी दारुण पराभव झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान केले आहे. 'बर झाले आम्ही तीन दिवसांमध्येच कसोटी सामना हरलो. आता आराम करण्यासाठी आम्हाला आणखी दोन दिवस मिळतील' असे कर्णधार धोनीने म्हटले आहे.
चौथ्या कसोटीतील दारुण पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी पत्रकार परिषदेला सामोरे गेला. यात धोनीने पराभवावर ही प्रतिक्रिया दिल्याने वाद निर्माण झाला आहे. इंग्लंड दौ-यात आमचे आघाडीचे फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने आम्ही मालिकेत २-१ ने पिछाडीवर गेल्याची कबूली धोनीने दिली. गेल्या दोन सामन्यात आमचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. मात्र तळाच्या फलंदाजांनी भारताला तारले. या सामन्यात मात्र सर्व फलंदाज अपयशी ठरल्याचे धोनीने सांगितले. या पराभवामुळे आम्हाला दुःख झाल्याचेही धोनी नमूद केले.