ऑनलाइन लोकमत
धर्मशाला, दि. 16 - भारताने पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणा-या प्रणालीचा(डीआरएस) वापर करावा यासाठी आयसीसीकडून बीसीसीआयची वारंवार मनधरणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून २० आॅक्टोबर रोजी आयसीसी महाव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासमक्ष अपग्रेड करण्यात आलेल्या डीआरएस प्रणालीचे सादरीकरण देणार आहेत. भारत- इंग्लंड मालिकेतील पाच कसोटी सामन्यादरम्यान डीआरएसचा वापर व्हावा, असे आयसीसीला वाटते.मुख्य कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली हे देखील सादरीकरणाच्यावेळी उपस्थित राहतील. हे दोघेही या काळात वन डे साठी नवी दिल्लीत वास्तव्यास असतील. कुंबळे स्वत: आयसीसी क्रिकेट समितीचे चेअरमन आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या डीआरएसचा स्वीकार करण्यास नकार देणारा भारत हा एकमेव देश आहे. या तंत्राचा पहिल्यांदा वापर २००८ मध्ये झाला होता.बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे दरम्यान पत्रकारांशी चर्चा करताना आम्ही डीआरएसला कधीही नकार दिला नव्हता, असे स्पष्ट केले. डीआरएसमधील उणिवा आधी दूर व्हाव्यात. ही पद्धतपरिपूर्ण असेल तर आम्हाला अमलात आणण्यास हरकत नाही. या पद्धतीत सुधारणा झाल्यास आम्हाला देखील वापर करण्यास हरकत राहणार नसल्याचे लंकेच्या दौ-याच्यावेळी देखील मी स्पष्ट केले होते.’ ठाकूर पुढे म्हणाले,‘ कुंबळे स्वत: आयसीसी क्रिकेट समितीचे बॉस आहेत. त्यांनी डीआरएसवर एमआयटीच्या(मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी)अहवालाचा अभ्यास केला आहे. आयसीसी महाव्यवस्थापक नवी दिल्लीत सादरीकरण देतील त्यावेळी कुंबळे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतरच डीआरएसचे सुधारित रूप मान्य करण्यास आम्ही तयार आहोत की नाही हे मी सांगू शकेन. मी डीआरएसच्या सादरीकरणाद्वारे समाधानी झालो तर आगामी भारत- इंग्लंड मालिकेदरम्यान डीआरएस वापराबद्दल गंभीरपणे विचार केला जाईल.’(वृत्तसंस्था)