नवी दिल्ली : अध्यक्ष अनुराग ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असलेल्या शपथपत्रावर आज, शनिवारी येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेत चर्चा होणार आहे. याशिवाय लोढा समितीच्या सुधारणावादी शिफारशींवर देखील संलग्न राज्य संघटनांचे प्रतिनिधी मतप्रदर्शन करणार आहेत.एक राज्य एक मत, तीन वर्षांचा कार्यकाळ आणि पदाधिकाऱ्यांसाठी एका टर्मनंतर तीन वर्षांचा ब्रेक, आदी मुद्यांवर देखील सविस्तर चर्चा केली जाईल. लोढा समितीची शिफारस म्हणजे सरकारी हस्तक्षेप आहे, असे आयसीसीला लिहिण्यास आपण सांगितले होते का याबद्दल स्पष्टीकरण देणारे शपथपत्र सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने ठाकूर यांना दिले होते. आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी अलीकडेच माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे विधितज्ज्ञ शपथपत्र तयार करीत असल्याचा दावा केला होता. पूर्व विभागाच्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही ‘एक राज्य एक मत’ या नियमाविरुद्ध नाही. आमचे म्हणणे इतकेच की बोर्डाचे प्रतिनिधी वाढविण्यात यावेत. मणिपूर, मिझोरम, अरुणाचल आणि नागालँड या राज्य संघटनांना मत देण्याचा अधिकार बहाल करावा. शिवाय मुंबई आणि सौराष्ट्र यांचा मताधिकार काढून घेण्यात येऊ नये. एखादा पदाधिकारी बोर्डात तीन वर्षे पदावर असेल तर त्यानंतर त्याला तीन वर्षे ब्रेक घ्यावा लागेल. त्यानंतरच्या टर्ममध्ये तो पुन्हा पदावर येऊ शकेल. बोर्डाच्या अनेक लोकांच्यामते सहा वर्षांचे दोन कार्यकाळ भूषविण्याची मुभा देण्यात यावी. टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी हा प्रस्ताव दिला होता, हे विशेष. त्रिपुरा आणि विदर्भ संघटनेने मात्र लोढा समितीच्या शिफारशींचे तंतोतंत पालन करण्याचे ठरविले आहे. तथापि, अन्य अनेक राज्य संघटनांना लोढा समितीच्या शिफारशी मान्य नाहीत. यामुळे क्रिकेटचे नुकसान होणार असल्याची या लोकांना भीती वाटते. (वृत्तसंस्था)
‘बीसीसीआय’ची आज विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2016 1:38 AM