मुंबई : आगामी २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत भूतान येथे सुवर्ण महोत्सवी आशियाई अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी १९ जुलैला चेन्नई येथील कामराज सभागृहात निवड चाचणी स्पर्धेसाठी देशभरातील किमान सर्वोत्तम ४० शरीरसौष्ठवपटूंचा भारतीय संघ निवडण्याची शक्यता आहे.देशभरातील सुमारे दिडशे शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. भूतान येथे होणाऱ्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी रेल्वेचा किरण पाटील, रामनिवास, जावेद खान आणि सर्बो सिंग यांनी कंबर कसली असून त्यांना टक्कर देण्यास सेनादलाचा महेश्वरन, तामीळनाडूचा राजेंद्रन मणी, उत्तर प्रदेशचा यतिंदर सिंग सज्ज झाले आहेत. तसेच सुनीत जाधव, जगदीश लाडसारखे महाराष्ट्रातील मातब्बर खेळाडूही यावेळी कडवी झुंज देतील. तसेच महिला गटात सरिता देवी, रबिता देवी यांच्यासह मॉडेल फिजीक प्रकारात श्वेता राठोड, मनोज पाटील, निलेश बोंबले, सोनाली स्वामी हे देखील सज्ज झाले आहेत.गेल्या दोन वर्षांतील भारतीय शरीरसौष्ठवपटूंची कामगिरी पाहता, आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडू वर्चस्व राखतील. शिवाय निवड चाचणीतून किमान ४० ते ५० खेळाडू निवडले जाणार असल्याने या स्पर्धेसाठी भारताचा आजपर्यंतचा सर्वात मोठा संघ दाखल होईल, अशी अशा भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केली. (क्रीडा प्रतिनिधी)
चेन्नईत आज शरीरसौष्ठवचा थरार
By admin | Published: July 19, 2016 4:29 AM