नवी दिल्ली : नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय खेल परिषदेने (एआयसीएस) खेळासाठी मिळत असलेला निधी देशाच्या जनसंख्येनुसार खूप कमी असल्याचे सांगत केंद्र सरकारने त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी केली आहे.देशाच्या दृष्टीने सध्याचा ८८६ कोटी रुपयांचा खेळासाठीचा निधी खूपच कमी आहे आणि त्यासाठी सरकारने यात मोठ्या प्रमाणात वाढ करायला हवी. विविध शिफारशीत खेल परिषदेच्या सदस्यांनी पदकविजेत्यांसाठी राज्यांकडून एकसारखी बक्षीस रक्कम देण्याचेही आवाहन केले आहे, असे जवळपास अडीच तास चाललेल्या बैठकीनंतर एआयसीएसचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा म्हणाले.मल्होत्रा म्हणाले, ‘आम्हाला आपल्या क्रीडा धोरणाचा विस्तार करावा लागेल. आमचा निधी ८00 कोटी रुपयांचा आहे आणि प्रति व्यक्तीनुसार हे फक्त सात ते आठ रुपयेच होते. यातील काही राज्य गुजरात आणि हरियाणा हे चांगले करीत आहेत.’ या बैठकीत माजी भारतीय अॅथलिट पी.टी. उषा आणि माजी धनुर्विद्या प्रशिक्षक लिंबा रामदेखील उपस्थित होते. तथापि, माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर बैठकीस उपस्थित राहू शकला नाही. एआयसीएसने देशभरात १0 लाख स्पोर्टस् क्लब स्थापन करण्याची शिफारस केली आहे. मल्होत्रा म्हणाले की, ‘प्रत्येक गावात खेळांच्या सुविधा असायला हव्या आणि खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निधी खेळाच्या सुविधा निर्माण करण्यावर खर्च करायला हवा. त्यासाठी आम्ही १0 लाख स्पोर्टस् क्लब स्थापन करण्याची शिफरास केली आहे.’ या वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिकविषयी ते म्हणाले की, ‘रिओ आॅलिम्पिकमध्ये भारत कमीत कमी १00 खेळाडूंचे पथक खेळवेल, अशी आम्हाला आशा आहे. याशिवाय आम्ही बॉक्सिंगसारख्या वादग्रस्त संघटनांवर तोडगा काढण्यावर चर्चा करीत आहोत.’(वृत्तसंस्था)
खेल परिषदेची निधी वाढविण्याची मागणी
By admin | Published: January 11, 2016 3:21 AM