ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - सलामीवीर केदार देवधर (१४५) याच्या शतकाने बडोद्याने शनिवारी मुंबईविरुद्ध रणजी करंडक अ गटाच्या सामन्याच्या तिस-या दिवशी ५ बाद ३२१ धावा केल्या व आता त्यांची आघाडी ३0३ धावांची झाली आहे.
देवधरने त्याच्या खेळीत २३५ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार मारले. बडोदा संघाने पहिल्या डावात ३०५, तर मुंबईने ३२३ धावा केल्या होत्या. या सामन्याचा एक दिवस बाकी असल्यामुळे बडोदा संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करील. कारण मुंबईने पहिल्या डावात १८ धावांची आघाडी घेत ३ गुण निश्चित केले आहेत.
देवधरने आदित्य वाघमोडे (६६) याच्या साथीने बडोदा संघाला १७७ धावांची सलामी दिली. वाघमोडे बाद झाल्यानंतर दीपक हुडाने मुंबईच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला केल्या. त्याने ७५ चेंडूंतच ६ चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. देवधर व हुड्डा यांनी १२.४ षटकांत ५७ धावांची भागीदारी केली. देवधर बलविंदरसिंह संधू ज्युनियरच्या चेंडूंवर बाद झाला. या लढतीत पठाण बंधू इरफान (१२) आणि युसूफ पठाण (२) यांना मात्र आपला प्रभाव टाकता आला नाही.
बडोदा (पहिला डाव) ३०५ व दुसरा डाव ८६ षटकांत ५ बाद ३२१. (केदार देवधर १४५, आदित्य वाघमोडे ६६, दीपक हुडा खेळत आहे ६६, तुषार देशपांडे २/३९, अभिषेक नायर १/४८, बलविंदरसिंह संधू १/७१).