ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने केलेल्या नाबाद १५५ धावांच्या सर्वोत्तम खेळीनंतरही दिल्ली संघावरील संकट अद्याप कमी झाले नाही. दिवसअखेर दिल्लीने महाराष्ट्राविरुद्ध रणजी करंडकाच्या ब गटातील लढतीच्या तिस-या दिवशी शनिवारी ५ बाद ३७६ धावा केल्या. रणजी पदार्पण करणा-या मोहसीन सय्यदने घेतलेले ३ बळी हेदेखील आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
दिल्लीने एकवेळ त्यांचे ३ फलंदाज १३५ धावांवर गमावले होते; परंतु पंतने १६५ चेंडूंत २१ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १५५ धावा करीत दिल्लीचा डाव सावरला. दिल्लीने दिवसाच्या अखेरच्या षटकात तेजतर्रार डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन सय्यद याच्या गोलंदाजीवर मिलिंद कुमार याची विकेट गमावली. मिलिंदने पाचव्या फलंदाजाच्या रूपात ४५ धावा केल्या.
दिल्ली अजूनही महाराष्ट्राच्या पहिल्या डावाच्या २ बाद ६३६ (घोषित) या धावसंख्येच्या तुलनेत २५९ धावांनी पिछाडीवर आहे. दिल्लीला आघाडी मिळवायची असल्यास पंतला रविवारी चौथ्या आणि अखेरच्या दिवशी प्रदीर्घ फलंदाजी करावी लागेल, तर महाराष्ट्राला या लढतीत वर्चस्व ठेवायचे असेल, तर उर्वरित दिल्लीचे ५ फलंदाज तंबूत धाडावे लागतील.
त्याआधी रणजीत पदार्पण करणाºया महाराष्ट्राच्या २१ वर्षीय मोहसीन सय्यद याने आज धारदार गोलंदाजी केली. तथापि, पहिली विकेट श्रीकांत मुंडेने मोहित शर्मा (१८) याला पायचीत करीत महाराष्ट्राला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मोहसीन सय्यद याने दिल्लीचा कर्णधार उन्मुक्त चंद याला बाद करीत महाराष्ट्राला मोठे यश मिळवून दिले तसेच पदार्पणातील पहिला बळीही घेतला.
धु्रव शौरी (७१) आणि नितीश राणा (४४) यांनी तिसºया गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी केली; परंतु ही जोडी चिराग खुराणा याने त्याच्याच गोलंदाजीवर राणाला झेल घेत बाद करीत फोडली. राणाने ७३ चेंडूंत ७ चौकार मारले. शौरी आणि पंत यांनी चौथ्या गड्यासाठी १२४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मोहसीन सय्यदने शौरीला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद करीत महाराष्ट्राला यश मिळवून दिले. शौरीने १५८ चेंडूंत ७ चौकारांसह ७१ धावा केल्या. पंतने एक बाजू लावून धरताना मिलिंदच्या साथीने ११७ धावांची भर दिल्लीच्या धावसंख्येत टाकली. पंतचे हे दुसरे प्रथम श्रेणी शतक होते. त्याने त्याची १४६ धावांची सर्वोत्तम खेळी मागे टाकली. पंत व मिलिंद ही जोडी आणखी नुकसान होऊ देणार नाही, अशी चिन्हे होती; परंतु मोहसीन सय्यद याने मिलिंदला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद करीत पाचवा जोरदार धक्का दिला आणि त्याचबरोबर तिसºया दिवसाचा खेळही समाप्त झाला. मिलिंदने ९१ चेंडूंत ७ चौकारांसह ४५ धावा केल्या. मोहसीन सय्यदने १६.२ षटकांत ७३ धावांत ३ गडी बाद केले. त्याला श्रीकांत मुंडे आणि चिराग खुराणा यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : २ बाद ६३५ (घोषित).
दिल्ली (पहिला डाव) : ९४.२ षटकांत ५ बाद ३७६.
(रिषभ पंत खेळत आहे १५५, ध्रुव शौरी ७१, नितीश राणा ४४, मिलिंद ४५, उन्मुक्त चंद २४. मोहसीन सय्यद ३/७३, श्रीकांत मुंडे १/५९, चिराग खुराणा १/८५).