ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - धरमशाला कसोटीत भारतीय संघाने कांगारुंना लोळवतं 10 लाख डॉलरच्या बक्षिसावर नाव कोरले आहे. कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आयसीसीकडून टीम इंडियाला हे बक्षीस देण्यात आले आहे. आयसीसीच्या मानांकनात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी आणि बक्षिसावर दावा सांगण्यासाठी 1 एप्रिल 2017 ही अंतिम मुदत आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर भारताचे क्रमांक वनचे स्थान अधिक बळकट झाले आहे. 10 लाख डॉलर म्हणजे जवळजवळ 65 कोटींची कमाई भारताने 2016-17 च्या सत्रात केली आहे. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती. मात्र, 2015 पासून ही रक्कम 10 लाख डॉलर इतकी करण्यात आली.
2016-17 च्या मोसमात भारतीय संघ तूफान फॉर्ममध्ये आहे. भारताने या मोसमात एकही मालिका गमावली नाही. भारतीय संघाने ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करीत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले होते. भारताने न्यूझीलंडला 3-0 आणि इंग्लंडला 4-0 ने व्हाईटवॉश दिला. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरु-द्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने 208 धावांनी विजय मिळवला होता. 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीनंतर भारताचा एकही कसोटी पराभव झालेला नाही हे विशेष.ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळाल्यानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान कायम राहिले आहे. तर भारताच्या खात्यात 14 गुणांचा फायदा झाला आहे.
आयसीसी क्रमवारी -
- भारत - 122
- ऑस्ट्रेलिया - 108
- दक्षिण आफ्रिका - 107
- इंग्लंड - 101
- न्यूझीलंड - 98
- पाकिस्तान - 97
- श्रीलंका - 90
- वेस्ट इंडिज - 69