मुंबई : राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेत राज्य शासनाने घसघशीत वाढ केली असून, या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. खेळाडूंसोबत त्यांच्या प्रशिक्षकांच्या बक्षिसांच्या रकमेतही राज्य सरकारने भरीव वाढ केली आहे.राष्ट्रकुल स्पर्धेत राज्यातील खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली. सुवर्णपदक विजेत्यांना आता १० लाखांऐवजी ५० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्याला ७.५ लाखांऐवजी ३० लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्यास ५ लाखांऐवजी २० लाख रुपये मिळणार आहेत. खेळाडूंसोबतच प्रशिक्षकांच्या बक्षिसाच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रशिक्षकांना अनुक्र मे अडीच लाखाऐवजी १२.५ लाख, १ लाख ८७ हजार ५०० रुपयांऐवजी ७.५ लाख आणि १.२५ लाखाऐवजी ५ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. ग्लास्गो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्यपदकांची कमाई केली आहे. राही सरनोबत (नेमबाजीत सुवर्णपदक), अयोनिका पॉल (नेमबाजीत रौप्यपदक), गणेश माळी, ओम्कार ओतारी व चंद्रकांत माळी (भारोत्तोलनात कांस्यपदक) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शासकीय सेवेत विविध पदांवर सामावून घेण्यात येणार आहे. नेमबाज राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील इतर पदक विजेत्यांनाही याप्रमाणे शासकीय सेवेत घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रकुलपदक विजेत्यांच्या बक्षिसात घसघशीत वाढ
By admin | Published: August 12, 2014 1:14 AM