ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 26 - भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी २६१ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडने ५० षटकात सात बाद २६० धावा केल्या. न्यूझीलंडने ज्या प्रकारे सुरुवात केली होती ते पाहता न्यूझीलंड तीनशे किंवा त्यापुढे जाईल असा अंदाज होता. पण मधल्या षटकात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला धक्के देऊन धावगतीला लगाम घातला. त्यामुळे न्यूझीलंडला २६० धावात रोखता आले.
सलामीवीर गुप्टील आणि लॅथमने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची सलामी दिली. सुरुवातीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अजिबात दाद दिली नाही.
हार्दिक पांडयाच्या गोलंदाजीवर गुप्टीलने (७२) धावांवर यष्टीरक्षक धोनीकडे झेल दिला. लॅथेमला (३९) धावांवर अक्षर पटेलने रहाणेकरवी झेलबाद केले. कर्णधार विल्यमसन (४१) धावांवर अमित मिश्राच्या गोलंदाजीवर बाद झाला. नीशॅमला (६) धावांवर अमित मिश्राने कोहलीकरवी झेलबाद केले.
गुप्टील आणि लॅथमने सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. पंधराषटकानंतर भारताला पहिले यश मिळाले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकून कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे.