कुआंटन (मलेशिया) : भारतीय हॉकीपटूंनी आक्रमक व अफलातून खेळाचे प्रदर्शन करीत चीन संघाचा ९-० गोलने धुव्वा उडवित एशियन चॅम्पियनशिप चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी पहिल्या हाफ चार तर दुसऱ्या हाफमध्ये पाच गोल करून चीन संघाची हवा काढून टाकली. भारताकडून ९व्या मिनिटाला आकाश दीपने पहिला फिल्ड गोल करून संघाचे खाते उघडले. युसूफने १९व्या मिनिटाला जसजित सिंग कुल्लरने २२ व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. रुपेंद्रपाल सिंगने २५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर चौथा करून भारताची आघाडी मजबूत केली. नंतर निकीम तिमैयाने ३४व्या, ललित उपाध्यायने ३७व्या, आकाश दीपने पुन्हा ३९व्या आणि युसूफने ४०व्या मिनिटाला गोल केला. जसजितने शेवटचा नववा गोल ५१व्या मिनिटाला नोंदविला.भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय असून त्यांचे एकूण १० गुण झाले आहेत. भारतीय संघाची शेवटची लढत मलेशियाविरुद्ध होणार आहे. मलेशिया ३ सामन्यांमध्ये ९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या लढतीत जपानला १०-२ गोलने नमविले होते. कोरियाविरुद्ध त्यांना १-१ गोल बरोबरीत समाधान मानावे लागले. भारतीय संघाचा कर्णधार श्रीजेश सरावा दरम्यान जखमी झाल्यामुळे या सामन्यात तो खेळू शकला नाही. त्याच्या जागी आकाशने गोलरक्षण केले आणि ड्रॅग फ्लिकर रुपेंद्रपाल सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.(वृत्तसंस्था)
एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारत उपांत्य फेरीत
By admin | Published: October 26, 2016 12:50 AM