ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २७ - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथचे दमदार शतक आणि तळाच्या फलंदाजांनी त्याला दिलेली मोलाची साथ याआधारे तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५३० धावांचा डोंगर रचला आहे. या कसोटीतही ऑस्ट्रेलियाचे तळाची फलंदाज भारतासाठी डोकेदुखी ठरले आहेत.
दुस-या दिवशी ५ बाद २५९ धावांवरुन पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ (१९२ धावा) आणि ब्रॅड हॅडिन ५५ धावा या जोडीने सहाव्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हॅडिननंतर मिचेल जॉन्सन २८ आणि रेयॉन हॅरिस ७४ धावा यांनी स्मिथला मोलाची साथ देत संघाला ५०० धावांचा पल्ला गाठून दिला. स्मिथ व्दिशतक ठोकेल असे वाटत असतानाच उमेश यादवने त्याची विकेट घेतली व ऑस्ट्रेलियाचा डाव ५३० धावांवर आटोपला. भारतातर्फे मोहम्मद शमीने चार तर आर. अश्विन आणि उमेश यादवने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.