मुंबई : गुजरातविरुद्ध झालेल्या पराभवाची कामगिरी मागे टाकून महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ६६व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत दमदार पुनरागमन करताना अरुणाचल प्रदेशचा ७१-२९ असा फडशा पाडला.म्हैसूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील लेव्हल टू गटामध्ये झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करताना पहिल्याच क्वार्टरमध्ये २१-९ अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मात्र यानांतर अरुणाचल संघाने १४-९ असे गुण मिळवताना सहजासहजी हार पत्करणार नसल्याचा इशाराच दिला. यावेळी महाराष्ट्राने आपला हिसका दाखवताना तिसऱ्या क्वार्टरमध्ये २६-०, तर चौथ्या क्वार्टमध्ये १५-६ अशी बाजी मारून अरुणाचलच्या पराभवावर शिक्का मारला. उमेश आणि रोहन यांनी प्रत्येकी १३ तसेच अजिंक्य माने याने १२ गुण वसूल करताना महाराष्ट्राच्या विजयात चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या महिलांना मात्र छत्तीसगडविरुध्द ४५ - ७२ अशा पराभवास सामोरे जावे लागले. पुनम चतुर्वेदी (२३), सरणजीत कौर (१७), संगीता कौर (११) यांच्या जोरावर छत्तीसगडने विजयी कूच केली. तर महाराष्ट्रकडून संगीता (१३), शिरीन लिमये (१०) आणि कर्णधार मनीषा डांगे (१०) यांनी अपयशी झुंज दिली.
महाराष्ट्रने अरुणाचल प्रदेशला नमवले
By admin | Published: January 13, 2016 3:52 AM