नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी यंदा ‘भारतरत्न’ची घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा असून, भारतातील हा सर्वोच्च नागरी सन्मान हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना मिळणार का? असा प्रश्न कोट्यवधी भारतीयांना सतावत आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नावाची देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’साठी शिफारस करण्याबाबत परस्परविरोधी वृत्त कानांवर पडत असल्यामुळे, मेजर ध्यानचंद यांचे पुत्र व विश्वकप विजेत्या संघाचे सदस्य अशोक ध्यानचंद नाराज झाले आहेत. गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सांगितले की, ‘ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यासाठी अनेक विभागांतून शिफारशी प्राप्त झाल्या असून, त्या सर्व पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या आहेत.’ ‘भारतरत्न’साठी शिफारशीची औपचारिकता आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ने गौरविण्यासाठी सरकारने राष्ट्रपतींकडे शिफारस केली असल्याचे वृत्त इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उमटले आहे. त्यानंतर केंद्र सरकारमधील मंत्री याबाबतच्या वृत्ताचे खंडन करीत आहेत.संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू म्हणाले, ‘भारतरत्नसाठी अद्याप एकही नाव निश्चित झालेले नाही. याबाबत जे काही चर्वितचर्वण सुरू आहे, ते केवळ मीडियाने निर्माण केलेली कथा आहे. सर्व कथा मीडियाने रचलेल्या असून अद्याप याबाबत कुठलीच चर्चा झालेली नाही.’केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ‘भारतरत्न’बाबत सुरू असलेली चर्चा फेटाळून लावताना, अद्याप कुठलेच नाव विचाराधीन नसल्याचे सांगितले. दरम्यान, मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांचे दिवंगत पिता ध्यानचंद यांचे नाव वारंवार ‘भारतरत्न’साठी चर्चेत असते. जो निर्णय घ्यायचा आहे त्यावर सरकारने प्रांजळपणे मत व्यक्त करावे, असे अशोक कुमार यांनी म्हटले आहे.ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ने गौरविण्याचा निर्णय घेण्यात येणार असेल, तर सरकारने त्याची अधिकृत घोषणा करावी; अन्यथा त्यांच्या नावाची चर्चा करीत हॉकी जगतातील सर्वांत महान खेळाडूचा अपमान करू नये, असे स्पष्ट मत माजी आॅलिम्पियन्सनी व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)
मेजर ध्यानचंद ‘भारतरत्न’ सन्मानाचे मानकरी ठरणार?
By admin | Published: August 13, 2014 1:32 AM