मुंबई : सलामीवीर फैझ फझलचे (१२७) शतक, करुण नायर (९२), सुदीप चॅटर्जी (५४), शेल्डॉन जॅक्सन (नाबाद ५९) आणि स्टुअर्ट बिन्नी (५४) यांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी या जोरावर शेष भारतने रणजी विजेत्या मुंबईने दिलेले ४८० धावांचे अशक्यप्राय आव्हान पार करून विक्रमी विजयासह इराणी ट्रॉफीवर कब्जा केला. शेष भारतने ६ फलंदाजांच्या मोबदल्यात ४८२ धावा फटकावत शानदार विजेतेपद पटकावले.ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात संघाला विक्रमी विजेतेपद मिळवून देताना फझलने २८० चेंडूंत १० चौकारांसह १२७ धावांची संयमी खेळी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. सुदीपने १०९ चेंडूंत ५ चौकारांसह आपली खेळी सजवली. यानंतर मधल्या फळीमध्ये करुण नायरने १३२ चेंडूंत ७ चौकारांसह ९२ धावा फटकावून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. तर शेवटच्या फळीत जॅक्सन (७६ चेंडूंत नाबाद ५९) व बिन्नी (५१ चेंडूंत ५४) यांनी फटकेबाजी करताना मुंबईच्या हातातील विजेतेपद हिसकावून घेतले. पाचव्या व अखेरच्या दिवशी १ बाद १०० वरून सुरुवात करत शेष भारतने सावध खेळ केला. फझल-सुदीप यांनी ११० धावांची भागीदारी केली. यानंतर फझलने नायरसह निर्णायक १३० धावांची भागीदारी करून मुंबईकरांवर दडपण टाकले. नायर आणि कर्णधार नमन ओझा १७ धावांच्या अंतराने बाद झाल्याने मुंबईकरांना पुनरागमनाची संधी मिळाली, मात्र यानंतर जॅक्सन आणि बिन्नी यांनी एकदिवसीय सामन्याप्रमाणे हल्ला करताना मुंबईकरांची गोलंदाजी फोडून संघाला विक्रमी विजेतेपद पटकावून दिले. मुंबईकडून इक्बाल अब्दुल्लाचा अपवाद वगळता इतर सर्व गोलंदाज अपयशी ठरले. अब्दुल्लाने १५४ धावांच्या मोबदल्यात शेष भारतचा अर्धा संघ बाद केला. मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून साथ मिळाली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक : मुंबई : पहिला डाव - सर्व बाद ६०३ धावा आणि दुसरा डाव - सर्व बाद १८२ धावाशेष भारत : पहिला डाव - सर्व बाद ३०६ धावा आणि दुसरा डाव - १२९.४ षटकांत ६ बाद ४८२ धावा (फैझ फझल १२७, सुदीप चॅटर्जी ५४, करुण नायर ९२, शेल्डॉन जॅक्सन नाबाद ५९, स्टुअर्ट बिन्नी ५४; इक्बाल अब्दुल्ला ५/१५४)
मुंबईने हातातील विजेतेपद गमावले
By admin | Published: March 11, 2016 2:58 AM