मुंबई : जयंत यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या अचूक माऱ्यापुढे इराणी ट्रॉफी समान्यात, शेष भारतविरुद्ध मुंबईचा दुसरा डाव केवळ १८२ धावांत संपुष्टात आला. मात्र, पहिल्या डावात घेतलेल्या २९७ धावांच्या आघाडीच्या जोरावर मुंबईकरांनी शेष भारतसमोर विजयासाठी ४८० धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. शेष भारतनेही दुसऱ्या डावाची भक्कम सुरुवात करताना, चौथ्या दिवसाअखेर १ बाद १०० अशी मजल मारली. अजूनही शेष भारताला विजयासाठी ३८० धावांची आवश्यकता आहे.ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात घेतलेल्या मजबूत आघाडीनंतर, फलंदाजीला उतरलेल्या मुंबईचा डाव शेष भारतच्या अचूक माऱ्यापुढे ढेपाळला. सिद्धेश लाडने मध्यल्या फळीत खेळताना झुंजार ६० धावांची खेळी केल्याने मुंबईला दीडशेची मजल मारता आली. त्याने १०९ चेंडूंत ६ चौकार व एक षटकार खेचला. त्याच वेळी सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ देताना, ७६ चेंडूत ७ चौकारांसह ४९ धावा फटकावल्या. त्याचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले.४ बाद ६२ अशा प्रतिकूल परिस्थितीतून संघाला सावरताना सूर्यकुमार व लाड यांनी पाचव्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. जयंत यादवने सूर्यकुमारला बाद करून ही जोडी फोडली आणि पुढील ६६ धावांत मुंबईचा डाव संपुष्टात आणण्यात शेष भारत यशस्वी ठरला. जयंत यादवने टिच्चून मारा करताना ९३ धावांत ४ बळी घेतले, तर जयदेव उनाडकटने १६ धावांत ३ बळी मिळवले. यानंतर शेष भारतने सावध सुरुवात केली. फैझ फझल आणि श्रीकर भरत यांनी संघाला अर्धशतकी सलामी देताना ६६ धावांची भागीदारी केली. इक्बाल अब्दुल्लाने भरतला (४२) बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. मात्र, यानंतर सुदीप चॅटर्जीने फझलला अखेरपर्यंत साथ देताना, मुंबईकरांना आणखी यश मिळवू दिले नाही. फझल ४१ धावांवर तर चॅटर्जी १७ धावांवर खेळत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईचा दुसरा डाव ढेपाळला
By admin | Published: March 10, 2016 2:36 AM