जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. एवढेच नाहीतर, या स्पर्धेत पाकिस्तान खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घातली जाऊ शकते.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा येत्या जूनमध्ये भारतात खेळली जाणार होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भूतानचे खेळाडू रांचीला पोहोचले असून त्यांनी सरावही सुरू केला होता. आता ही स्पर्धा कोणत्या तारखेला आयोजित केली जाईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. याआधी ही स्पर्धा ३ ते ५ मे दरम्यान खेळवली जाणार होती. परंतु, पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घातली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात येण्यासाठी दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले. वृत्तानुसार, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमधून एकूण ४३ खेळाडूंची नावे पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये भालाफेकपटू अर्शद नदीमचे याच्याही नावाचा समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे बुधवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाममधील बैसरणा येथे दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. त्यानंतर पर्यटकांना नावे विचारले आणि गोळ्या घालून ठार मारले.