कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ विश्वचषक टी-२० स्पर्धेसाठी उद्या (बुधवारी) नवी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि, भारतात होत असलेल्या या स्पर्धेदरम्यान पाक संघाच्या सुरक्षाव्यवस्थेच्या मंजुरीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाक संघातील सर्व अधिकारी आणि खेळाडूंना मंगळवारी रात्रीपर्यंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचण्यास सांगण्यात आले. खेळाडू तसेच अधिकाऱ्यांना बुधवारी भारताकडे निघण्याचे संकेत देण्यात आले. राष्ट्रीय अकादमीत पीसीबीप्रमुख खेळाडूंना शुभेच्छा देतील. त्यानंतर सर्व खेळाडू लाहोर विमानतळाकडे रवाना होणार आहेत. पण टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात जाण्याबाबत पाकिस्तान बोर्डाकडून कोणतीही निश्चित सूचना खेळाडू व व्यवस्थापकांना देण्यात आलेली नाही.पाक संघाला नवी दिल्लीतून कोलकाता येथे दाखल व्हायचे आहे. तेथे संघाचे ओपन मीडिया सेशन आटोपल्यानंतर तेथेच त्यांना वेस्ट इंडीजविरुद्ध सराव सामनादेखील खेळायचा आहे. पाक सरकारने मात्र अद्यापही संघाला भारताकडे रवाना होण्याची अधिकृत परवानगी दिलेली नाही. दरम्यान, पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी आयसीसीला पत्र लिहून सामना धरमशाला येथून इतरत्र हलविण्याची विनंती केली आहे.
पाक क्रिकेट संघ आज दिल्लीत दाखल होणार?
By admin | Published: March 09, 2016 5:13 AM