ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - भारत आणि पाकिस्तानमध्ये १९ मार्चला धरमशाळा येथे होणा-या सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यीय पथकाने सामन्याला हिरवाकंदिल दाखवल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी मागच्या आठवडयात भारत-पाकिस्तान सामन्याला सुरक्षा देण्यास असमर्थता प्रगट केल्यानंतर सामन्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. धरमशाळाचे जिल्हाधिकारी आणि पोलिस महानिरीक्षकांनी पाकिस्तानी पथकाला पुरेशी सुरक्षा देण्याची हमी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा पाकिस्तानी संघाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाची पथके तैनात करण्याचे आश्वासन दिले आहे. स्पर्धेचे संचालक एमव्ही श्रीधर यांनी आज गृहमंत्रालयातील अधिका-यांची भेट घेतल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना नियोजित वेळापत्रकानुसारच होईल असे स्पष्ट केले.