अमोल मचाले, पुणेप्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सत्रात पुणेरी पलटन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, सुमार कामगिरीमुळे हा संघ सध्या तळाला फेकला गेला आहे. बचावाच्या क्षेत्रात कमजोर ठरल्यामुळे पुणेरी पलटन संघ अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याची कबुली संघाचा कर्णधार वजीरसिंग आणि प्रशिक्षक रामफल वजीर यांनी दिली.जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी ‘लोकमत’सोबत संवाद साधताना वजीर म्हणाला, ‘‘पुण्यातील पाठीराख्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलोय, याची जाणीव आहे. बचावात कमजोर पडल्यामुळे काही सामन्यांत महत्त्वाच्या क्षणी आम्हाला नुकसान पत्करावे लागले. या खेळात आक्रमणासोबतच बचावदेखील महत्त्वाचा ठरतो. अव्वल स्थानावरील यू मुंबासह इतर संघांकडे चांगले बचावपटू आहेत. इतर संघ आणि आमच्या संघातील कामगिरीमध्ये याचमुळे फरक पडलाय.’’ वजीरसिंग हा ‘वन मॅन आर्मी’प्रमाणे एकटाच झुंजतोय. मात्र त्याला इतर खेळाडूंकडून पहिजे तशी साथ लाभू शकलेली नाही. हे मान्य करतानाच आपल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेत तो म्हणाला, ‘‘इतर खेळाडू आपल्या परीने प्रयत्न करताहेत. मात्र, ते पुरेसे नाहीत. आव्हान कायम राखण्यासाठी आता आम्हाला यापुढील प्रत्येक लढत जिंकणे अनिवार्य झाले आहे. संघातील सर्व खेळाडूंना याची जाणीव आहे. प्रत्येक लढत महत्त्वाची असल्याने आम्ही उर्वरित लढतींत सर्वस्व पणाला लावून खेळ करू.’’
कमजोर बचावामुळे ‘पलटन’ तळाला
By admin | Published: August 16, 2014 12:04 AM