मुंबई : टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकून कसोटी मालिकेतही विजय मिळवण्यासाठी सज्ज झालेल्या दक्षिण आफ्रिकेने दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत अध्यक्षीय संघाचा डाव २९६ धावांत संपुष्टात आणला. यानंतर झटपट दोन बळी घेत भारत अध्यक्षीय संघाने दिवसअखेर द. आफ्रिकेची २ बाद ४६ अशी अवस्था केली. विशेष म्हणजे कसोटी मालिकेपुर्वी सरावाची संधी मिळालेल्या चेतेश्वर पुजाराने घोर निराशा करताना केवळ ५ धावा काढल्या. त्याचवेळी लोकेश राहुलने मात्र शानदार ७२ धावांची खेळी करुन भारतीय संघातील आपली दावेदारी मजबूत केली.ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारत अध्यक्षीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर उन्मुक्त चंद, कर्णधार पुजारा आणि मध्यल्या फळीतील श्रेयश अय्यर स्वस्तात परतल्याने अध्यक्षीय संघाची ३ बाद २७ अशी अवस्था झाली होती. यानंतर राहूल आणि करुण नायर यांनी १०५ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी करुन संघाला सावरले. खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे स्थिरावला असल्याचे दिसत असतानाच नायरने खराब फटका मारुन विकेट फेकली. त्याने ७० चेंडूत ९ चौकारांसह ४४ धावा काढल्या. काहीवेळाने राहूलही बाद झाल्याने अध्यक्षीय संघाचा डाव ५ बाद १५५ असा घसरला. राहूलने १३२ चेंडूत १३ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. जॅक्सन आणि नमन ओझा यांनी सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. यावेळी ओझाने काही आकर्षक फटके मारले. जॅक्सन १५ धावा काढून बाद झाला तर ओझाने शानदार ५२ धावांची खेळी करताना ८० चेंडूत ७ चौकार व एक षटकार मारला. यानंतर हार्दिक पांड्या आणि जयंत यादव यांनी आठव्या विकेटसाठी वेगवान ५४ धावांची भागीदारी केली. हार्दिकने ५५ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा फटकावल्या. तर यादवने चांगली साथ देत २२ धावांची खेळी केली. (क्रीडा प्रतिनिधी)
अध्यक्षीय संघाच्या २९६ धावा
By admin | Published: October 30, 2015 10:31 PM