नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात मोक्याच्या स्पर्धांत सायनाला दुखापती झाल्या. यामुळे तिच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाला, असे जागतिक महिला क्रमवारीतील द्वितीय आणि अव्वल भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी सांगितले.जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील चमकदार कामगिरी केल्यानंतरच सानियाच्या कामगिरीत अचानकपणे घसरण झाली. या स्पर्धेनंतरच ती दुखापतींशी झगडत आहे. यामुळेच गेल्या अनेक काळांपासून तिने अनेक सराव सत्रामध्येही सहभाग घेतलेला नाही. विशेष म्हणजे आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड सुपर लीग टेनिस स्पर्धेआधी सायनाला प्रत्येक स्पर्धा खेळणे आवश्यक असून, याद्वारेच तिला आपले जागतिक क्रमांक कायम ठेवता येईल.विमल कुमार यांनी सांगितले, की दुखापतींतून सावरण्यासाठी सायना योग्यप्रकारे उपचार घेत असून, तिचे वेळापत्रक खूप व्यस्त झाले आहे. मागील अनेक आठवड्यांपासून ती सरावापासून दूर आहे. माझ्यामते जागतिक क्रमांक कायम ठेवण्यासाठी तिने स्वत:वर दडपण आणले आहे. मला यामुळे खूप चिंता वाटत आहे; कारण माझे लक्ष्य सायनाला रिओ आॅलिम्पिकसाठी तंदुरुस्त राखण्याचे आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर घसरलेल्या सायनाच्या कामगिरीविषयी विमल म्हणाले, की जागतिक स्पर्धेदरम्यान खूप वेदना होत असतानाही ती खेळली. (वृत्तसंस्था)
दुखापतींमुळे सायनाच्या कामगिरीवर परिणाम
By admin | Published: November 02, 2015 12:19 AM