नवी दिल्ली- आॅस्ट्रेलियाचा आगामी भारत दौरा २०१३ पेक्षा वाईट ठरणार नाही, असा विश्वास आॅस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनने व्यक्त केला. त्यावेळी वॉटसन आणि अन्य चार क्रिकेटपटूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. वॉटसन म्हणाला, ‘त्यावेळी खेळाडूंना कसोटी सामन्यातून निलंबित करण्यात आले होते. यावेळी असे घडणार नाही, असा मला विश्वास आहे.’ आॅस्ट्रेलियाला २०१३ मध्ये भारत दौऱ्यात ०-४ अशा क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. वॉटसन व्यतिरिक्त जेम्स पेटिन्सन, मिशेल जॉन्सन आणि उस्मान ख्वाजा यांच्यावरही एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. वॉटसनने २००४-०५ च्या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी ग्लेन मॅकग्रा, कास्प्रोविज आणि जेसन गिलेस्पी या वेगवान गोलंदाजांसह दिग्गज फिरकीपटू शेन वॉनच्या साथीने आॅस्ट्रेलिया संघाने विजय साकारला होता. वॉटसन म्हणाला, ‘केवळ फिरकी गोलंदाजीच्या बळावरच विजय मिळवता येतो, असे नाही. २००४ मध्ये संघात फिरकीपटू म्हणून केवळ शेन वॉर्न होता आणि तीन वेगवान गोलंदाज होते.’
आगामी मालिका २०१३पेक्षा वाईट नसेल : वॉटसन
By admin | Published: January 18, 2017 4:23 AM