ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 21 - आगामी भारत - इंग्लंडमध्ये होणा-या टेस्ट क्रिकेट मालिकेत पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणा-या प्रणालीचा(डीआरएस) वापर करण्यात येणार आहे. बीसीसीआयने या मालिकेपुरता ट्रायल म्हणून डीआरएसचा वापर करण्याची मान्यता दिली आहे. आगामी भारत-इंग्लंड मालिकेत या पद्धतीचा वापर करण्याचा गांभीर्याने विचार बीसीसीआयतर्फे केला जात होता. या निर्णयामुळे द्विपक्षीय मालिकेत भारतात पहिल्यांदाच डीआरएसचा वापर होईल. यापूर्वी भारतात 2011 च्या वर्ल्डकपमध्ये डीआरएसचा वापर झाला होता.
भारताने पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणा-या प्रणालीचा(डीआरएस) वापर करावा यासाठी आयसीसीकडून बीसीसीआयची वारंवार मनधरणी करण्यात येत होती. या प्रक्रियेचा भाग म्हणून गुरुवारी आयसीसी महाव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासमक्ष अपग्रेड करण्यात आलेल्या डीआरएस प्रणालीचे सादरीकरण देण्यात आले.
सध्या अस्तित्वात असलेल्या डीआरएसचा स्वीकार करण्यास नकार देणारा भारत हा एकमेव देश आहे. या तंत्राचा पहिल्यांदा वापर २००८ मध्ये झाला होता. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे दरम्यान पत्रकारांशी चर्चा करताना आम्ही डीआरएसला कधीही नकार दिला नव्हता, असे स्पष्ट केले होते.
या प्रणालीमध्ये अनेक दोष असल्याचा दावा करून बीसीसीआयने पहिल्यापासूनच याचा विरोध केला आहे. त्याचमुळे भारतात होणार्या किंवा भारतीय संघ सहभागी असलेल्या विदेशातील द्विपक्षीय मालिकेत डीआरएसचा वापर केला जात नव्हता. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धेत मात्र भारताला याचा वापर करणे बंधनकारक होते. विशेष म्हणजे जगातील सर्वच क्रिकेट मंडळांनी डीआरएसचा स्वीकार केला आहे.