ऑनलाइन लोकमत -
अँटिग्वा, दि. 21 - वेस्ट इंडिजविरोधात आजपासून कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी आघाडी मिळविण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. चार कसोटी सामन्यांची ही मालिका जिंकून कॅरेबियन भूमीत विजयाची हॅटट्रिक साधण्याची संधी यावेळी कर्णधार विराट कोहलीकडे आहे. नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच भारतीय संघ खेळत आहे.
कर्णधार विराट कोहली कॅरेबियन भूमीत मालिका विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्यास उत्सुक आहे. २००७ मध्ये राहुल द्रविड आणि २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारत मालिका जिंकला होता. कोहलीच्या नेतृत्वात भारताने गतवर्षी लंकेला २-१ ने आणि द. आफ्रिकेला ३-० ने पराभूत केले होते. भारत आणि विंडीज संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून अँटिगामध्ये सुरुवात होत आहे.
खेळपट्टीवर गवत असले तरी पाच दिवसांत खेळपट्टीला भेगा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा वेळी भारतीय संघात पाच गोलंदाज असतील. स्टुअर्ट बिन्नीऐवजी अमित मिश्राला संधी दिली जाईल. ईशांत शर्माचा जोडीदार म्हणून मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. पाच गोलंदाज उतरविण्याचा अर्थ रोहित शर्माला पुन्हा राखीव बाकावर बसावे लागेल. दोन दिवसांआधी झालेल्या ऐच्छिक सरावात मात्र तो सहभागी झाला होता. त्याच्याशिवाय बिन्नी, मिश्रा, चेतेश्वर पुजारा आणि के. एल. राहुल यांनी सराव केला. तिसऱ्या स्थानावर राहुल की पुजारा हा देखील उत्सुकतेचा विषय आहे. राहुल उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याने दोन्ही सराव सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती. दुसरीकडे विंडीजकडे डेरेन ब्राव्हो आणि मर्लोन सॅम्युअल्स हे अनुभवी खेळाडू आहेत. कर्णधार जेसन होल्डर याला दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अन्य फलंदाजांना तितकासा अनुभव नाही. देवेंद्र बिशू हा एकमेव फिरकीपटू संघात आहे. वेगवान माऱ्यासाठी शेनोन गॅब्रियल, मिगूल कमिन्स, कार्लोस ब्रेथवेट व स्वत: होल्डर असा चांगला पर्याय उपलब्ध आहे.