ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १८ - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असे सूचक विधान महेंद्रसिंह धोनीने केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तिन्ही कसोटी सामन्यात भारतीय संघांला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंह धोनीने सामन्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या दारुण पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का असा प्रश्न धोनीला पत्रकारांनी विचारला. 'या पराभवातून पुन्हा नव्या दमाने उभं राहण्यास मी सक्षम आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागेल' असे सूचक उत्तर धोनीने दिले आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून खूप काम केलय का या प्रश्नावरही त्याने 'बहुतेक, हो' असे उत्तर दिले आहे.
शेवटच्या तीन सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला टक्कर देण्यात सपशेल अपयशी ठरल्याने आम्ही खूप निराश आहोत असे धोनीने सांगितले. तीन दिवसाच्या आतच हा सामना संपल्यावर धोनीने फलंदाजांनाही सुनावले. 'भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीचे हे प्रतिबिंब आहे' असे धोनीने म्हटले आहे. २०११ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौ-यात भारतीय संघाने लागोपाठ आठ कसोटी सामने गमावले आहेत. तर २०१३ - १४ मध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड दौ-यामध्येही भारताची पराभवाची मालिका सुरुच आहे.
मुरली विजयने चांगली फलंदाजी केली. पण सलामीची जोडी दमदार सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळे तिस-या क्रमांकावर येणारा फलंदाज हा सामन्याच्या पहिल्या पाच षटकाच्या आतच मैदानात यायचा. विराट कोहलीलाही सूर सापडला नाही असे धोनीने स्पष्ट केले. सहा फलंदाज घेऊन खेळत असताना झटपट विकेट गेल्यास त्याचा फटका संघाला बसतो. तळाच्या फलंदाज खेळल्यास संघाने ३०० ची मजल गाठली व तेही बाद झाल्यास संघ धावा करण्यासाठी झटत होता असे विश्लेषण धोनी मांडतो. भुवनेश्वर कुमार हा भारताचा एकमेव खेळाडू आहे जो संपूर्ण मालिकेत सातत्त्याने चांगली कामगिरी करत होता असे सांगत धोनीने भुवनेश्वरचे कौतुक केले.