रोक्लाव : दीपिकाकुमारी, बोम्बायलादेवी लैशराम आणि लक्ष्मीराणी माझी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने मेक्सिको संघावर ६-0 असा विजय मिळवून तिरंदाजी वर्ल्ड कपच्या चौथ्या फेरीत सुवर्णपदक मिळविले. तरुणदीप रॉय, जयंत तालुकदार आणि अतानू दास यांच्या पुरुष संघाला मात्र अंतिम फेरीत मेक्सिकोकडून ३-५ असे पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय महिला संघाला मेक्सिको संघाला हरविण्यात कोणतीही अडचण आली नाही. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी दीपिकाकुमारी भारताच्या विजयाची स्टार ठरली. तिने पाचपैकी तीन टेन लगावले. विजयानंतर ती म्हणाली मी फारशी अडचणीत नव्हते. या विजयाची पुनरावृत्ती आशियाई स्पर्धेत होईल, अशी आम्हाला आशा आहे. पुरुष संघाने अंतिम सामन्यात २-0 ने आघाडी घेतल्यानंतर मेक्सिको संघाने मागे वळून बघितलेच नाही. भारत हा सामना ३-५ असा हरला. दोन्ही गटांतील कांस्यपदके चीनने जिंकली. मिश्र दुहेरीत भारताच्या अभिषेक वर्मा आणि पूर्वशा शिंदे या जोडीला अंतिम सामन्यात अमेरिकन जोडी ब्रॅडन गॅलेनतिएन आणि क्रिस्टल गोविन यांच्याकडून पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)
विश्व तिरंदाजीत महिला संघाला सुवर्ण
By admin | Published: August 11, 2014 2:21 AM