‘घरोघरी मुलींना शिकवलं जातं की, परक्या माणसांपासून लांब रहा, कुणाशी बोलू नको आणि एक दिवस अचानक एका अनोळखी-परक्या माणसासोबत तिचं लग्नच लावून दिलं जातं, की मग थेट त्याच्या घरीच रहायला जायचं.’
याला काय कल्चर म्हणतात?
-असले प्रश्न आता आपल्याही देशात तरुण मुलं विचारत आहेत. अॅरेन्ज मॅरेज नको, लव्ह मॅरेज करू, आपल्या मनासारखा जोडीदार निवडू, मुख्य म्हणजे निवडीचंच नाही, तर मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य घेऊ; असा हा नवीन काळ!
मात्र गंमत पहा, लव्ह मॅरेज आणि अॅरेन्ज मॅरेज, हे दोन शब्द इंग्रजी असले तरी, ते मुळात अस्सल इंग्रजी संस्कृतीतले नाहीत. या दोन गोष्टींमधली भिन्नता समजून भारतात, या दोन्ही शब्दांचा जन्म झाला असावा. बाकी जगात, ‘लग्न’ अर्थात ‘मॅरेज’ या एका शब्दात निवड-आवड-स्वातंत्र्य-इच्छा हे सारं अभिप्रेत असतं.
आपल्या समाजात मात्र ‘ठरवून’ आणि ‘प्रेम’ करून या दोन्ही गोष्टींनी लग्नाचे अर्थच बदलतात.
आणि बदलतात, कुटुंब व्यवस्थेचे संदर्भ.
म्हणून तर एकीकडे भारतात सोशल नेटवर्किग, मॅचमेकिंग, ऑनलाइन मॅट्रिमोनिअल्स साइट्स यांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. ‘कास्ट नो बार’ असं लिहिणारे मोजके का होईना प्रोफाइल्स दिसू लागलेत.
मुख्य म्हणजे जगभरातल्या तारुण्याला ‘एकाकी’पणा नावाच्या आजारानं ग्रासायला सुरुवात केली असताना भारतातले तरुण आजही ‘कुटुंब’ या धाग्याला धरून आहेत. आपलं कुटुंब ही आपली ताकद आहे, त्याप्रती आपली काही जबाबदारी आहे, असा विचार अजूनही अनेक तरुण करतात.
घरांमध्ये काच आहेत, अबोले आहेत, परस्पर मतभिन्नता आहे हे जितकं खरं, तितकंच हेही खरं की, अनेक घरांमधून वडिलांचा दरारा संपला आहे. ‘अहो, बाबा’चा ‘अरे, बाबा’ झाला आहे, आई-वडिलांशी बोलून आणि प्रसंगी त्यांना समजावूनही आपापला मार्ग शोधण्याची तरकीब तरुणांना गवसू लागली आहे.
जागतिकीकरणानंतर आलेला ‘डीडीएलजे’ आणि आत्ता आलेला ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ साधारण एकाच वळणाचे, आपलं मन न मारता, घरच्यांना आपल्या सुखात सामावून घेत ‘समंजस’ मार्ग काढणारे.
‘प्रॅक्टिकल’ होत-होत भावनांकडेही प्रॅक्टिकली पाहणारी एक तरुणपिढी या देशात श्वास घेऊ लागली आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित, पण जगातील इतर देशांच्या मानाने ब:यापैकी स्थिर असलेली कुटुंबव्यवस्था आणि तरुणपिढीला मिळणारा त्या व्यवस्थेचा आधार हीदेखील परदेशी अभ्यासकांच्या दृष्टीने या देशाची एक महत्त्वाची स्ट्रेंग्थ आहे.
75 % भारतीय तरुण आजही अॅरेंज मॅरेज अर्थात ठरवून केलेल्या लग्नालाच पसंती देतात.
त्यातही 82 % तरुणींचा अॅरेंज मॅरेजवर
अधिक विश्वास दिसतो.
**
आपल्यासाठी जोडीदार निवडताना
आई-बाबा, भाऊ-बहिण यांचा सल्ला महत्त्वाचा आहे
असं मुलींना वाटतं तर,
मुलांना मात्र, आता लग्नाचा निर्णय
स्वत:चा स्वत:च घेणं योग्य वाटतं.
***
देशभरात 75% तरुणांना अॅरेन्ज मॅरेज पसंत असलं, तरी
तरी उत्तर भारतात मात्र,
82% तरुणांचा ठरवून लग्नालाच होकार आहे.
***
लग्न ठरवताना पारंपरिक मार्गच योग्य असं म्हणणारी तरुण मुलं सेलिब्रेशन मात्र, आधुनिक विशेषत: वेस्टर्न पद्धतीनंच करायचं ठरवतात.
34% तरुणांना रिसॉर्टमध्ये, 30% मुलांना डिलक्स हॉटेलमध्ये तर 13% मुलांना एखाद्या फार्म हाऊसवर लग्न करण्याची इच्छा असते.
***
लग्नानंतर हनिमूनला कुठं जायचं? या प्रश्नाचं उत्तर म्हणून अनेकजणांना देशांतर्गत पर्यायच योग्य वाटतात. गोवा-उटी-श्रीनगर हे टॉप फेवरेट.
***
अॅरेंज मॅरेज ही कालबाह्य पद्धत आहे, असं अनेकांचं म्हणणं असलं तरी अॅरेंज मॅरेज झालेल्यांच्या
घटस्फोटांचं प्रमाण जगभरात कमी आहे आणि भारतात तर अत्यंत कमी आहे. जगात ठरवून केलेली लग्न मोडण्याचं प्रमाण 4 % आहे, तर भारतात तेच 1.1 % इतकं आहे.
***
प्रेमात पडून, लिव्ह इनमध्ये राहून लग्न करणा-या अमेरिकन जोडप्यांत घटस्फोटाचं प्रमाण 50 % आहे. भारतात तेच प्रमाण 1.1% इतकं आहे.
***
एका जाहिरात संस्थेच्या अभ्यासानुसार लग्नानंतर आई-वडिलांसोबतच रहायचं असं म्हणणा:या वयाच्या पंचविशीतल्या मुलांचं प्रमाण या देशात 70 % हून अधिक आहे.
***
भावंडं आणि मित्र यापैकी जास्त जवळचं कोण याचं उत्तर 40% जण मित्र, तर उरलेले 60 % भावंडं असं देतात.
***
ग्रामीण भारतात सुमारे 82 % तरुण आई-वडिलांना सोडून देण्याचा विचारही करवत नाही, असं सांगतात.
**
पण तरीही..
* भारतात आत्महत्त्यांचं प्रमाण वाढतं आहे. डिप्रेशन-फ्रस्ट्रेशन हे आजार तरुण मुलांना घेरत आहेत आणि त्यावर उपचार किंवा त्याविषयी बोलणं हेदेखील अजून समाजमान्य होताना दिसत नाही.
* जगात सर्वाधिक तरुण आत्महत्त्या होणा:या देशात भारत दुसरा आहे.
* जगात सर्वाधिक खूनही भारतात पडतात.
* इतका राग, द्वेष कुठून येतो, तो कसा हॅण्डल करायचा याचं काही प्रशिक्षण भारतात उपलब्ध नाही.
* भारतातही शहरी अािण निमशहरी भागात आता घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे. विशेषत: मध्यवर्गात हे प्रमाण वाढताना दिसतं. बदलत्या जीवनशैलीतून उद्भवणारे संघर्ष हे घटस्फोटांचं मूळ कारण असल्याचं अभ्यास सांगतात.
* आपल्या देशात एम्प्टी नेस्टर्स, म्हणजे एकेकटय़ा आई-बाबांचे प्रश्नही आता पुढे येऊ लागले आहेत.