तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. एकूण १२७ मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. ३३९ सदस्य निवडले जाणार आहेत. एकूण मतदार-१ लाख ८ हजार ६६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये स्त्री ५२ हजार १५०, पुरुष ५६ हजार ५१८ मतदारांचा समावेश आहे. दुसरीकडे निवडणूक असलेल्या गावातील पॅनल प्रमुख आपल्या पॅनल मध्ये निवडलेल्या इच्छुक उमेदवारांचे कागदपत्रे जमा करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला खर्चाच्या तपशिलासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडून त्याच्य पासबुकची झेरॉक्स प्रत उमेदवारी अर्ज सहज जोडणे आवश्यक असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याने पॅनल प्रमुख बँक खाते उघडण्यासाठी धावपळ करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथ पत्राचे आवश्यकता असल्याने शपथ विक्री खरेदी करण्यासाठीही उमेदवारांची गर्दी होत आहे. राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र किंवा प्रस्ताव दाखल केलेल्या प्रस्तावाची पोचपावती अर्जासोबत दाखल करणे अनिवार्य केल्याने धावपळ उडत असल्याचे दिसून येत आहे.
१४ अधिकाऱ्यांची नियुक्ती
तहसील कार्यालयाच्या परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या शंकानिरसन करण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. याठिकाणी १४ प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला तीन गावे वाटून दिली आहेत. या गावातील इच्छुक उमेदवारांच्या शंकानिरसन करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यावर आहे.