कोरोनाच्या आजारावर शासनाने प्रतिबंधात्मक लस उपलब्ध केल्यानंतर सुरुवातीच्या काळात ही सुरक्षित लस आहे का? असा संशय निर्माण झाला होता. त्यामुळे लसीकरणासाठी फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. केंद्र शासनाने दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली. त्यानंतर या लसीकरणाचा वेग वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार ६७७ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. त्यामध्ये २० हजार ९७० नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर २ हजार ७०७ नागरिकांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करून दिल्यानंतर खऱ्याअर्थाने या लसी करण्याचा वेग वाढला आहे. ६० वर्षांपूर्वी ८ हजार २७७ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. त्याचप्रमाणे ४५ ते ५९ वर्ष या वयोगटातील १ हजार ८७१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ४ हजार १६० फ्रन्टलाइन वर्कर आणि ८ हजार ६६९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. लसीकरणासाठी आतापर्यंत ५०१ सत्र वापरण्यात आले. सर्वच तालुक्यांमध्ये कोरोना लस सध्या उपलब्ध असून, त्या ठिकाणी रांग लागल्याचे दिसून येत आहे. एकंदर कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे.
आरोग्य कर्मचारी उद्दिष्टपूर्तीकडे
जिल्ह्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर कोरोना योद्ध्यांचा त्यात समावेश झाला. आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धा येथे मिळून १४ हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले होते. आतापर्यंत ८ हजार ६६९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले असून, कोरोना योद्धा असलेल्या पोलीस, महसूल कर्मचारी व इतर कर्मचारी अशा ४ हजार ८६० कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लसीकरण उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करीत आहे.
तालुकानिहाय झालेली लसीकरण
गंगाखेड २६८३
जिंतूर २२५५
मानवत १४८४
पालम ९५१
परभणी ७४०१
पाथरी १४१०
पूर्णा २३१७
सेलू : ४२१७
सोनपेठ ९५९