जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. परभणी तालुक्यात दिवसभरात २९७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
सेलू तालुक्यामध्ये १३७ अर्ज दाखल झाले आहेत. पालम तालुक्यात ८७ जणांनी, गंगाखेड ९१, सोनपेठ ६७, मानवत ५२, पाथरी २८ आणि पूर्णा तालुक्यामध्ये १४१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. सुरुवातीचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तीन दिवस सलग शासकीय सुट्या असल्याने कोणतेही कामकाज झाले नाही. मात्र, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच तालुक्यांमध्ये इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची तालुक्याच्या ठिकाणी गर्दी झाली होती. परभणी तालुक्यातील उमेदवारी अर्ज कल्याण मंडपम् येथे स्वीकारण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. ३१ डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे दोन्ही दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.