परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीत ३० डिसेंबर रोजी ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी दिल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ थांबणार आहे.
जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरचा एक दिवस शिल्लक आहे. यावेळच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले. मात्र, २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून निवडणूक आयोगाच्या सर्व्हरची गती कमी झाल्याच्या तसेच तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नयेत. तसेच त्यांना निवडणूक लढविण्याची संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने ३० डिसेंबर रोेजी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अर्ज स्वीकारण्याच्या वेळेतही वाढ करण्यात आली असून, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.
त्यामुळे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारण्याच्या व वाढीव वेळेच्या सूचना द्याव्यात. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्राचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध करुन द्यावेत, असे सूचित करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये आर. ओ. लॉगीनमधून भरुन घ्यावेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.