परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २१ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७५ पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करुन शिबिरास प्रतिसाद दिला.
विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ.उदय देशमुख, प्राचार्य डॉ.सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ.उदय खोडके, प्राचार्या डॉ.जयश्री झेंडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महेश देशमुख, डॉ.जगदीश जहागीरदार, डॉ.कल्याण आपेट आदींची उपस्थिती होती. प्रा.संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ.महेश देशमुख यांनी आभार मानले. विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला.
टप्प्या-टप्प्याने शिबिरे घ्यावीत : वासकर
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. एका रक्तदानामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात. अशा परिस्थितीमध्ये रक्तदान शिबिरे आयोजनावर भर द्यावा. विविध संस्थांनी एकाच वेळी शिबिर आयोजित न करता टप्प्या-टप्प्याने शिबिरे आयोजित केल्यास रक्तपेढीला नियमित रक्तपुरवठा होईल. त्यामुळे कृषी विद्यापीठातही यापुढील काळात टप्प्या-टप्प्याने रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. डॉ.उदय देशमुख म्हणाले, थॅलेसेमिया, गरोदर महिला, ॲनेमिया, अपघातात जखमी रुग्णांना सातत्याने रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे वर्षभर नियोजनबद्ध रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे, असे सांगितले.