पालम : तालुक्यातील फळा येथे २० मार्च रोजी रात्री ७ च्या सुमारास अवकाळी पावसापूर्वी आलेल्या जोरदार वादळीवाऱ्यात मुख्य विद्युतवाहिनीच्या तारा एकमेकांना स्पर्श होऊन पाचटावर ठिणगी पडल्याने दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
फळा शिवारात भगवान नरहरी ढवळे व अर्जुन रामकिशन ढवळे यांचा प्रत्येकी एक एकर असा एकूण दोन एकर ऊस आहे. साखर कारखान्याची टोळी वेळेत न मिळाल्याने ही उचल पक्की होऊनही तोडणीअभावी शेतात उभा राहिला आहे. २० मार्च रोजी रात्री ७ च्या सुमारास मुख्य विद्युतवाहिनीचा खांब आडवा झाला असून, तारा लोंबकळल्या होत्या. वाऱ्यामुळे या मोकळ्या तारा एकमेकांशी स्पर्श होऊन उसाच्या शेतात पाचटीवर पडल्या. त्यामुळे पाचटाने पेट घेतल्याने दोन एकरांत ही आग पसरली. यात पूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.