शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणू नये बाजार समितीचे आवाहन
मानवत : येथील खरेदी केंद्रावर कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने २३ डिसेंबरपासून सीसीआयच्या वतीने अनिश्चित काळासाठी कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे.
मानवत येथे सीसीआयच्या वतीने २० नोव्हेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील करार केलेल्या १० जिनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यात येत आहे. मानवत येथील केंद्रांवर सोनपेठ, पाथरी, मानवत, गंगाखेड, जिंतूर तालुक्यासह परजिल्ह्यातून कापसाची दररोज १२ ते १५ क्विंटल विक्रमी आवक येत आहे. सद्यस्थितीत करार केलेल्या जिनिंगमध्ये कापूस साठवणूक करण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने २३ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत खरेदी बंद राहणार असल्याचे लेखी पत्र सीसीआयचे केंद्रप्रमुख एस गलगठ यांनी २२ डिसेंबर रोजी बाजार समितीला दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन सभापती पंकज आंबेगावकर यांनी केले आहे.
एक महिन्यात २ लाख ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी
मानवत तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याकडे आहे. २० नोव्हेंबर रोजी सीसीआयने हमीदाराने कापसाची खरेदी सुरु केली. येथे दररोज ९०० ते १ हजार वाहन यार्डात दाखल होत असून त्याद्वारे १५ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. ३० दिवसांत सीसीआयने २ लाख ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे.