सरकारी आरोग्य सुविधांच्या क्षमतांची परीक्षा
यावर्षी जिल्ह्यात आरोग्याच्या बाबतीत इतर कोणत्याही महत्त्वाच्या घटना नसल्या तरी कोरोनाच्या शिरकावामुळे जिल्ह्यातील सरकारी आरोग्य क्षेत्राच्या क्षमतांची परीक्षाच झाली. ही यंत्रणा किती तोकडी आहे. या यंत्रणेसाठी मिळणारा तुटपुंजा निधी, आरोग्य विभागातील रिक्त पदे, कमी मनुष्यबळ, भौतिक सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची कमतरता आणि अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयांचा अभाव या संकटाने आरोग्य विभाग उघडा पाडला. मोठी धावपळ झाली, ऐनवेळी निधी दिला, तात्पुरती कर्मचारी भरती करुन संकट निभावून नेले असले तरी या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी किती गंभीर पावले उचलावी लागणार आहेत. पुन्हा असे मोठे संकट आले तर आरोग्य यंत्रणा सक्षम असायला हवी. त्यामुळे सरत्या वर्षातील संकटातून काही तरी शिकून पुढील वर्षात त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.