पालम : तालुक्यातील पेठपिंपळगाव येथे शेतात काढणीसाठी साठा करून ठेवलेल्या हरभरा पिकाच्या गंजीला अज्ञाताने १९ मार्च रोजी रात्री उशिरा आग लावल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून पालम पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठपिंपळगाव शिवारात विजय दगडोपंत शिंदे यांची ८ एकर शेती आहे. मागील आठवड्यात कापणी केलेल्या हरभऱ्याचा ढीग रचून साठा करण्यात आला होता. दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस येत असल्याने हा ढीग ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आला होता. या गंजीतून ३० क्विंटल उत्पादन होणे अपेक्षित होते. हरभरा काढण्यासाठी विजय शिंदे शेतात गेले असता हरभऱ्याची गंजी जळून खाक झाल्याचे दिसले. या घटनेमुळे शिंदे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.