मानवी हृदयाचे साधारणपणे चार कप्पे असतात. त्यापैकी वरच्या बाजूच्या उजव्या व डाव्या बाजूचे जे कप्पे असतात, त्यामध्ये छिद्र किंवा पोकळी असल्यास अशुद्ध रक्त, शुद्ध रक्तामध्ये मिसळते. हा आजार जन्मत:च काही लहान मुलांमध्ये असतो. परिणामी मुलांची पूर्ण वाढ न होणे, मंद बुद्धी, दम लागणे, मुलांचे चेहरे सुजलेले व निस्तेज दिसणे यासारखी लक्षणे आढळून येतात. पनवेल येथील लाइफलाइन हॉस्पिटल येथील बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांनी परभणी येथील डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे या अनुषंगाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. सदरील शस्त्रक्रिया ही बिनटाक्याची असून दुर्बीण मशीनद्वारे हृदयाच्या दोन कप्प्यांमधील जी पोकळी किवा छिद्र असते ते बंद करण्यात येते. त्यामुळे शुध्द व अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये न मिसळून रुग्ण सामान्य होतो. याआधी रुग्णालयामध्ये पेसमेकर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या यशाबद्दल रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रफुल्ल पाटील व संचालिका डॉ. विद्या प्रफुल्ल पाटील यांनी डॉ. भूषण चव्हाण व त्यांच्या सर्व सहकारी टीमचे अभिनंदन केले आहे. तसेच अशा शस्त्रक्रियेसाठी आता अशा रुग्णांना परभणीबाहेर मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
परभणीत प्रथमच बाल हृदयशस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:22 AM