सेलू : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नाईलाजाने कडक निर्बंध घालावे लागतील, असा इशारा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सोमवारी दिला.
येथील नगरपालिकेच्या साई नाट्यगृहात तालुका आपत्ती प्राधिकरण समितीच्यावतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पारधी बोलत होते. यावेळी आ. मेघना बोर्डीकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, तहसीलदार बालाजी शेवाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, अशोक काकडे, पोलीस निरीक्षक अजय पांडे आदींची उपस्थिती होती. मागील पंधरा दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या काळात १०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. परिणामी नाईलाजाने प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. बेडची कमतरता लक्षात घेता आणखीन दोन वसतिगृहात बेडची व्यवस्था केली जाणार आहे. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो आजपर्यंत केवळ ४ हजार नागरिकांनी लस घेतली आहे तर ५१० नागरिकांनी दुसरी लस घेतली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.