लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही या निवडणुकीचे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याने या कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गावोगावी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडणे, मतदानानंतर मतमोजणी निकाल जाहीर करण्याची कामे या कर्मचाऱ्यांनी केली. कोणत्याही निवडणुकीत निवडणूक संपताच अधिकारी- कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन अदा केले जाते. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडून आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही या कर्मचाऱ्यांचे मानधन दिलेले नाही. संपूर्ण जिल्ह्यात ही परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांचे मानधन वितरीत करण्यासाठी प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. निधीअभावी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वात संवेदनशील असतात. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी काम करुन निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या. मात्र, त्यांच्या कामाचा मोबदला वेळेत मिळत नसेल तर काय उपयोग? असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून विचारला जात आहे.
५६६
जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती
१५७३
निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी
४८१९
निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी
निधीची अडचण
कोणत्याही निवडणुका पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतर काही दिवसातच त्यांचे मानधन मिळते. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो. सध्या निधी नसल्याने मानधन थकल्याचे सांगितले जाते.
तालुकानिहाय आढावा
तालुका ग्रामपंचायती अधिकारी/कर्मचारी
परभणी ७९ १०२८
जिंतूर ९० ११३२
सेलू ५५ ६९६
पाथरी ३८ ४४८
मानवत ३९ ४८४
सोनपेठ ३४ ४३६
गंगाखेड ६० ७६०
पालम ४५ ५६४
पूर्णा ५८ ७४४