सॅनिटायझर्सच्या मशीन पडल्या बंद
परभणी : येथील शासकीय कार्यालयात काही महिन्यांपूर्वी बसविलेल्या सॅनिटायझर्सच्या मशीन्स सध्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनही कोरोनाच्या अनुषंगाने फारसी काळजी घेत नसल्याचे सध्याच्या स्थितीवरुन दिसत आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात सॅनिटायझर मशीन शोभ्याच्या ठरल्या आहेत.
पीक कर्ज वाटपाची वाढेना गती
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रबी हंगामात पेरणी करण्यासाठी बँकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून कर्ज देताना बँका आखडता हात घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात बँकांचे कोणतेही सहकार्य लाभले नाही. बँका उद्दीष्ट पूर्ण करीत नसतनाही जिल्हा प्रशासनाकडून मात्र कारवाई होत नाही.
जिल्ह्यात वाढले सिंचनाचे क्षेत्र
परभणी : जिल्ह्यात यावर्षी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून, सिंचन क्षेत्र वाढले आहे. येलदरी, निम्न दुधना या मुख्य प्रकल्पांबरोबरच ढालेगाव, डिग्रस, मुदगल, तारुगव्हाण या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झालेला आहे. त्याचप्रमाणे जायकवाडी प्रकल्पातूनही जिल्ह्याला पाण्याचे एक आवर्तन मिळाले आहे. परिणामी रबी आणि बागायती पिकांसाठी पाणी उपलब्ध झाले असून, जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढले आहे.
रोहयोच्या कामांची संख्या वाढेना
परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढविण्यात आली नाहीत. त्यामुळे साधारणत: एक लाखांपेक्षा अधिक मजुरांची जिल्ह्यात नोंदणी असताना काम मात्र अवघ्या ८ ते १० हजार मजुरांनाच मिळत आहे. विशेष म्हणजे शासकीय यंत्रणाच कामे हाती घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. लॉकडाऊन काळात मोठ्या शहरातून अनेक जण जिल्ह्यात वास्तव्याला आले आहेत. त्यांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोहयोची कामे वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील रस्त्यांवर वाढला धुळीचा त्रास
परभणी : शहरात रस्त्या-रस्त्यावर धूळ वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाचे स्वच्छता कर्मचारी नियमित स्वच्छता करीत असले तरी खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे धुळीचा त्रास कायम आहे.