विजेअभावी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
परभणी : जिल्ह्यात ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देताना अडथळे निर्माण होत आहेत. कृषी पंपाचा वीजपुरवठा दिवसा सुरू ठेवावा, असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. कृषी पंपाचा वीजपुरवठा दिवसा सुरळीत ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
एकाच तिकीट खिडकीमुळे प्रवाशांची गैरसोय
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर एकच तिकीट खिडकी सुरू ठेवली आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढविल्याने प्रवासी मोठ्या संख्येने तिकीट काढण्यासाठी स्थानकावर येत आहेत. मात्र, तिकीट खिडकी एकच असल्याने प्रवाशांना रांग लावून तिकीट काढावे लागत आहे. स्थानकावरील तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
मोकळ्या मैदानावर वाढले अवैध धंदे
परभणी : शहरात प्रत्येक वसाहतीमध्ये मोकळे मैदान असून, या मैदानांचा विकास झालेला नाही. त्यामुळे जागोजागी झाडे वाढली असून, दुर्गंधी पसरली आहे. अनेक भागात मोकळ्या मैदानांचा वापर वाम प्रकारासाठी होत आहे. मनपा प्रशासनाने मैदानांच्या विकासासाठी प्राधान्याने कामे हाती घेतल्यास शहर सौंदर्यात भर पडेल. शिवाय अवैध धंद्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
उड्डाणपुलावर वाहतुकीचा खोळंबा
परभणी : शहरातील उड्डाणपूल भागात तीनही मार्गाने वाहतूक होते. मात्र, या ठिकाणी वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. परिणामी अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्याचप्रमाणे अपघताची भीती निर्माण झाली आहे. या पुलावर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे झाले आहे.
पोलीस चौक्यांना अवकळा
परभणी : शहरातील पोलीस चौक्यांची दुरवस्था झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ठाण्यापासून दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी चौकीची उभारणी करण्यात आली होती. शहरातील विसावा पोलीस चौकीवगळता इतर पोलीस चौक्यांमध्ये कर्मचारी थांबत नाहीत. त्यामुळे चौक्यांची दुरवस्था झाली आहे. उड्डाणपूूल परिसर, जुना मोंढा, बसस्थानक या भागातील पोलीस चौकी पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.