परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, एका दिवसात ३२३ नव्या रुग्णांची भर पडली आहे; तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.
मागील एक आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दररोज शंभर ते दीडशे रुग्ण नव्याने नोंद होत आहेत. शनिवारी आरोग्य विभागाला १ हजार ३९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या ७०८ अहवालांमध्ये २३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत; तर रॅपिड ॲन्टिजेन टेस्टच्या ३३१ अहवालांमध्ये ९० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे मृत्यूचे सत्रही सुरूच असल्याने धास्ती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १० हजार ४७५ झाली असून, त्यापैकी ९ हजार २३९ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ८८८ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे १८३ रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार होत आहेत. तर ५९१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.
परभणी तालुक्यात २१४ रुग्ण
परभणी तालुक्यातच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शनिवारी तालुक्यामध्ये २१४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातही हा संसर्ग वाढत असून, ४५ नवे रुग्ण या ठिकाणी आढळले आहेत. सेलू तालुक्यात ३३, गंगाखेड ९, पूर्णा ५, पाथरी ५, सोनपेठ १ आणि मानवत तालुक्यात ३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय परजिल्ह्यातील काही रुग्ण परभणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.