१९ डिसेंबरपासून तापमानात बदल होण्यास प्रारंभ झाला. १२.३ अंशावरून पारा थेट ७ अंशापर्यंत घसरल्याने जिल्हाभरात वातावरण गारठले आहे. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्व व्यवहार उशिराने सुरू होत आहेत. पहाटेच्या सुमारास थंडीसह धुक्याची चादर पसरत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत थंडीचा असर रहात असून, सायंकाळी ६ वाजेनंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी होत आहे. उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यातील नीचांकी तापमान जिल्ह्यात नोंद केले जात आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २२ डिसेंबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात ५.१ अंश किमान तापमान राहिले आहे. हे तापमान या वर्षीच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. आणखी काही दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
असा घसरला पारा
१९ डिसेंबर : १२.३ अंश
२० डिसेंबर : ७ अंश
२१ डिसेंबर : ५.६ अंश
२२ डिसेंबर : ५.१ अंश