कुटुंबिय बाहेरगावी गेल्यानंतर घरातील संसारोपयोगी साहित्य सुरक्षित राहिले पाहिजे, ही प्रत्येक कुटुंबप्रमुखची अपेक्षा असते. यासाठी ते विविध उपाययोजना करीत असतात; परंतु घरासाठी लावण्यात येणारे कुलूप मजबूत व दणकट असले पाहिजे, याकडे मात्र त्यांच्याकडून कानाडोळा केला जात असल्याची परिस्थिती परभणी शहरातील कुलूप विक्रेत्यांची चर्चा केल्यानंतर समोर आली आहे. शहरातील मोंढा भागातील विक्रते मो. फहियोद्दीन मो. इसाक मोहसीन म्हणाले की, अनेक नागरिक लाखो रुपयांची संपत्ती घरात ठेऊन बाहेरगावी जाताना घराला लावण्यात येणारे कुलूप हलक्या दर्जाचे वापरतात. त्यामध्ये ६० रुपयांपासून १२० रुपयांचे कुलूप घेण्याकडे अनेकांचा कल आहे. सुरक्षित व मजबूत कुलूप लिंक व गोदरेज कंपनीचे आहेत. त्यांची किंमत जवळपास २५० रुपयांपासून २ हजार २५० रुपयांपर्यंत आहे; परंतु त्याला अनेक जण महत्व देत नाहीत. जे जाणकार आहेत, ते मात्र याचे महत्व ओळखतात. स्वतातले कुलूप घेताना अनेक जण दरामध्ये घासाघीस करतात. निश्चत केलेल्या किमतीपेक्षा आणखी कमी किंमत करा, असा आग्रह धरतात. हलक्या दर्जाचे कुलूप टिकावू नसते. त्यामुळे चोरीच्या वेळी ते सहजपणे निघते. परिणामी चोरटे घरातील दागिणे व अन्य वस्तू सहजपणे लंपास करतात. त्यामुळे आपल्या घरातील मौल्यावान वस्तू सुरक्षित ठेवायच्या असतील तर तशी कृतीतून काळजी देखील घेणे आवश्यक आहे. चोरी झाल्यानंतर पश्चाताप करीत बसण्यापेक्षा ती होऊ नये, या दृष्टिकोणातून खबरदारी घेणे आवश्यक आहे.
वर्षभरात झाल्या १८२ घरफोड्या
नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार जिल्ह्यात २०१९ या वर्षात चोरीच्या एकूण ५९६ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये १८२ घटना घरफोडीच्या आहेत. यातील तब्बतल १६८ घरफोडीच्या घटना या रात्री घडल्या आहेत. तर फक्त १४ घरफोडीच्या घटना दिवसा घडल्या आहेत. या घरफोडीतून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. बहुतांश घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याची बाब समोर आली आहे.