रेल्वेस्थानकावर सुविधांचा अभाव
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी सुविधांचा अभाव आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी सरकता जिना, लिफ्ट बसविण्यात आली होती. मात्र, सध्या या दोन्ही यंत्रणा बंद आहेत, तसेच मोठ्या रुंदीचा पादचारी पूल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे कामही रखडले असून, प्रवाशांना सध्या असुविधांचा सामना करावा लगात आहे.
कचऱ्याने वाढविली शहरात दुर्गंधी
परभणी : येथील गांधी पार्क परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. विशेष म्हणजे शिल्लक राहिलेला सडका भाजीपाला आणि इतर कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. हा कचरा नियमितपणे उचलला जात नाही. मनपाने काही दिवसांपूर्वी या ठिकाणी कचराकुंडीही बसविली; परंतु कुंडीतून बाहेर पडेपर्यंत कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या भागात कायम दुर्गंधी पसरत आहे.
वाहतुकीची कोंडी नित्याची समस्या
परभणी : शहरात जागोजागी वाहतुकीची कोंडी होत आहे. कुठे बाजारपेठेमुळे, तर कोठे जड वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा नित्याचा झाला आहे. शहरातील इतर सामाजिक प्रश्नांबरोबरच वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चुकीच्या ठिकाणी बसविला निवारा
परभणी : प्रवाशांना थांबण्यासाठी एस.टी. महामंडळाने ठिकठिकाणी प्रवासी निवारे उभारले आहेत. काही दिवसांपूर्वी जिंतूर रस्त्यावरील जेल कॉर्नर भागात हा निवारा उभारण्यात आला. मात्र, तो विरुद्ध बाजूने बसविल्याने या निवाऱ्यात एकही प्रवासी बसची प्रतीक्षा करीत थांबत नाही, तसेच जिंतूरकडून परभणी स्थानकाकडे येणाऱ्या बसगाड्याही महाराणा प्रताप चौकात थांबविल्या जातात. त्यामुळे बसमधून उतरलेल्या प्रवाशांनाही या निवाऱ्याचा उपयोग होत नाही. परिणामी लाखोंचा खर्च वाया गेला आहे.