हरभऱ्याचे पीक जिल्ह्यात जोमात
परभणी : मागील आठवड्यात तापमानात मोठी घट झाल्याने त्याचा फायदा हरभऱ्याच्या पिकाला झाला आहे. जिल्ह्यात सध्या हे पीक जोमात आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून, त्यात थंडी वाढल्याने हरभरा आणि गहू या दोन्ही पिकांची वाढ चांगली आहे. त्यामुळे रबी हंगामात या दोन्ही पिकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
पीक कर्ज वाटपाला मिळेना गती
परभणी : जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप संथगतीने होत आहे. विशेष म्हणजे बँकांनी खरीप हंगामातही शेतकऱ्यांना कर्ज वाटप केेले नाही आणि रबी हंगामातही कर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला आहे. सध्या कर्जासाठी शेतकरी बँकांमध्ये खेटा मारत आहेत. त्यांच्या फाईली प्रलंबित ठेवल्या जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून पीक कर्ज वाटप तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
बाह्यवळण रस्त्याचा प्रजश्न अधांतरीच
परभणी : शहराबाहेरुन जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्याच्या कामाचा प्रश्न सध्या अधांतरीत आहे. या मार्गासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र संबंधित शेतकऱ्यांना मावेजाची रक्कम अदा करुन जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाच पूर्ण केली जात नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील लोकप्रतिनधींनी या कामासाठी पाठपुरावा करुनही गती मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निधी असतानाही उद्यानाचे काम थंडबस्त्यात
परभणी : शहरातील उद्यानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध झालेला असतानाही हे काम पूर्ण केले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील शिवाजी पार्क उद्यानात नाना नानी पार्क उभारण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्याचप्रमाणे नेहरू पार्क उद्यानासाठी निधी उपलब्ध होऊन काम पूर्ण करण्यात आले. मात्र देखभाल दुरुस्तीअभावी या उद्यानाची दुरवस्था झाली आहे.
लाखो रुपयांची यंत्रणा धूळ खात
परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी उभारलेली सिग्नल यंत्रणा सध्या धूळ खात पडून आहे. या यंत्रणोच्या दुरुस्तीसाठी मनपा पाठपुरावा करीत नसल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी या यंत्रणेचा सध्या कोणताही वापर होत नाही. शहरातील वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेता सिग्नल सुरू करण्याची मागणी होत आहे.